| अहमदनगर : प्रतिनिधी
मिलिंद शेंडगे : बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
अहमदनगर व पुणे जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडू लागली असून किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याची नोंद भारतीय हवामान खात्याच्या स्थानिक केंद्राकडून झाली आहे. मंगळावर दि. १८ रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले असून रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे तसेच अधिकृत डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळणारी माहिती तपासत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
थंडीपासून बचावासाठी उपाय म्हणून नागरिकांनी..
- हिवाळ्यात स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे तसेच चादर, रगसारखे उबदार कपडे वापरावेत.
- तीव्र थंडीच्या लाटेदरम्यान शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
- शरीर ओले झाल्यास त्वरित कोरडे कपडे घालावेत, अन्यथा शरीरातील उष्णता कमी होते.
- शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पौष्टिक अन्न तसेच व्हिटॅमिन-सी युक्त फळे व भाज्या खाव्यात.
- गरम पाणी व गरम पेयांचे सेवन नियमित करावे.
- दीर्घकाळ थंडीत राहिल्यास हात-पाय बधीर होणे, त्वचा निस्
- तेज पडणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- थंडीने थरथर होत असल्यास लगेच उबदार ठिकाणी हलावे.
- पाळीव प्राणी व पशुधन थंडीपासून सुरक्षित ठिकाणी हलवावे.
नागरिकांनी हिवाळ्यात स्वतःबरोबरच जनावरांचेही संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असेही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. तातडीच्या मदतीसाठी १०८ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे.

